Mr.Abhishek Tirlotkar

online shoping all catogry product , fastion electric ,grocery retail , camera , etc good quality an

08/03/2022

तु कमजोर नाहीस कारण तुझ्यात रणरागिणी लक्ष्मीबाई अण् आई जिजाऊसाहेब आहे .
तु शिक्षणापासून वचिंत राहू नकोस कारण तु सावित्रीची लेक अन् मलालाची बहीण आहे.
तुझ्या मातृत्वाला देव सुद्धा भुकेला आहे कारण तु अनाथांची माई सिंधूताई आहे .
कोण म्हणत तुला जमणार नाही,
त्यांना सांग _
*अशक्य ते शक्य करी तीच शोभे स्त्री खरी* .
तुझा जन्म फक्त चुल अन मुल साठी नाही ,
तर कला,क्रिडा , सहित्य,संरक्षण, सामाजिक, राजकारण यात अव्वल स्थानी आहे.
कोण म्हणत तु कमजोर आहे, लता मंगेशकर, मेरी कोम, गिता फोगट, साईना नेहवाल, पि.व्ही सिंधू, इंदिरा गांधी, किरण बेदी, फक्त याच नाहीत तर अश्या अनेक अपरिचीत वाघिणी आहेत.
अगं तु तर आमचा मान आहे,
कोण म्हणत तुला शिकवल पाहिजे तुच तर शिकवते जगाला, आई,बहीण , मैत्रिण, प्रेयसी, सखी, आजी जशी वेगवेगळी रुप घेऊन .

....✍️ *अभिषेक तिर्लोटकर*


*माझ्या आयुष्यात आलेल्या . प्रत्येक स्त्रीचा आदर मी केला आणि करत राहणार आणि आदर करायला सांगणार*.
*महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

06/02/2022

लता मंगेशकर

लता मंगेशकर

कलेवरील दृढ निष्ठा, अपूर्व भक्ती, अखंड साधना यांच्या साहाय्याने भारतीय संस्कृतीचे प्रतीक ठरणारा विशुद्ध, अनाहत स्वर साकार करणार्‍या सर्वश्रेष्ठ गायिका!



भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर म्हणजे चित्रपट पार्श्र्वगायन क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राज्ञी. त्यांची थोरवी व त्यांचे चित्रपट पार्श्र्वगायनातील योगदान याचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडावे इतके त्यांचे कार्य व त्यांचा लौकिक मोठा आहे. लता मंगेशकर यांच्या प्रमुख उल्लेखाशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचं, संगीत क्षेत्राचं वर्णन पूर्ण होणारच नाही. नुसत्याच महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारत देशाला ललामभूत असणार्‍या आणि भारताचं नाव जगातील संगीत क्षेत्रात सतत उच्चस्थानावर ठेवणार्‍या एकमेवाद्वितीय कलावंत म्हणजे लता मंगेशकर; सर्व भारतीयांच्या लतादीदी!

१९२९ मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शुद्धमती उर्फ माई मंगेशकर यांच्या पोटी लतादीदींचा जन्म झाला. पाच भावंडांत सर्वात मोठ्या म्हणून त्यांची सर्व भावंडे त्यांना लतादीदी किंवा ‘दीदी’ असेच म्हणतात. तेच नाव इतर निकटवर्तीयही प्रेमाने घेतात. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी संगीत नाट्यक्षेत्रातील एक गाजलेले, दिग्गज गायक. याच श्रेष्ठ पित्याचा वारसा त्यांच्या पाचही अपत्यांना म्हणजेच लता, आशा, मीना, उषा व हृदयनाथ यांना अगदी भरभरून मिळाला. ही सर्व भावंडे संगीताची सेवा-आराधना आयुष्यभर करत आली आहेत व आपल्या कर्तृत्वाने त्यांनी आपला स्वरगंध भारतातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडेही पसरवला आहे. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हेच त्यांचे पहिले गुरूही. सुरुवातीला दीदींनी काही काळ वडिलांकडूनच संगीताचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खान, पं. अमान अली खान (भेंडीबाजारवाले), उस्ताद अमानत खान आणि काही काळ पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.

दिनांक १६ डिसेंबर, १९४१ रोजी पहिले गाणे आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले. १९४२ साली लतादीदींनी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले आणि नंतरचे सुमारे अर्धशतक त्या गातच राहिल्या. आजही त्या एखाद-दुसरे गीत गातात, एखाद्या ध्वनिमुद्रिमेच्या माध्यमातून आपला ‘अभिजात’ सूर ऐकवून रसिकांना आनंद देतात. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे वयाच्या १३ व्या वर्षीच पूर्ण कुटुंबाच्या लालनपालनाची जबाबदारी त्यांच्या कोमल खांद्यावर येऊन पडली. प्रथम अर्थार्जनासाठी म्हणून त्या चित्रपट पार्श्र्वगायनाकडे वळल्या. त्यांना सुरुवातीची काही वर्षे अतिशय शारीरिक, मानसिक व भावनिक हालअपेष्टांमध्ये काढावी लागली.

पार्श्वगायक व पार्श्वगायिका यांना त्या काळात ‘रॉयल्टी’ तर सोडाच पण मानधनही धड मिळत नसे. पण या परिस्थितीशी झगडत, नेटाने प्रयत्न करत लतादीदींनी या क्षेत्रात त्यांची मार्गक्रमणा सातत्याने आणि धैर्याने केली. पार्श्वगायकाचा वा गायिकेचा उल्लेखही चित्रपटाच्या नामोल्लेखात त्या वेळी केला जात नसे. केवळ मुख्य नायिकेला श्रेयनामावलीत स्थान असे. लतादीदींनी आपल्या कलेद्वारे व आपल्या खंबीर भूमिकेद्वारे ही पद्धत बदलून नामोल्लेखात पार्श्वगायक व गायिकेच्या नावाचा उल्लेख करण्याचा पायंडा पाडला. याचं श्रेय पूर्ण चित्रपट सृष्टी लतादीदींनाच देते.

लतादीदिंनी जवळ जवळ पावणे दोनशे संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले असून, सुमारे २३ भाषांमध्ये हजारो गाणी गायलेली आहेत. सी. रामचंद्र, सलील चौधरी, नौशाद, मदनमोहन, सचिनदेव बर्मन, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, पंचमदा (राहूल देव बर्मन), दत्ता डावजेकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे व पं. हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या स्वररचनांना लतादीदींचा स्वर्गीय स्वर लाभल्यामुळे अजरामर गाणी निर्माण झाली.

संत तुकारामांच्या अभंगगाथेतील अभंग, संत ज्ञानेश्र्वरांचे अभंग, विराण्या; लावण्या, बालगीत, अंगाईगीत, देशभक्तीपर गीत, धृपद, कव्वाली, रवींद्र संगीत; शांता शेळके, पी. सावळराम, मंगेश पाडगावकर, कवी कुसुमाग्रज, ग्रेस अशा दिग्गज कवींच्या रचना; गालिबच्या उर्दूतील गझल - हे सगळेच गानप्रकार लतादीदींच्या आवाजाने लीलया पेलले, इतकेच नव्हे तर सर्व गाणी अमृतमय झाली.

हिंदी चित्रपटांत पार्श्र्वगायन, मराठी चित्रपटगीते व मराठी भावगीते-भक्तिगीते या प्रमुख क्षेत्रांमध्ये दीदींनी संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या अविश्वसनीय, अद्वितीय असे योगदान दिले आहे. हिंदी चित्रपटांत सलील चौधरी, खेमचंद्र प्रकाश, नौशाद यांच्यापासून ते ए. आर. रहमान यांच्यापर्यंतच्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. हिंदी व मराठीमध्ये त्यांनी प्रामुख्याने मोहम्मद रफी, किशोर कुमार, हेमंतकुमार, मन्ना डे, मुकेश, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुधीर फडके, पं. हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर या दिग्गज गायक-गायिकांसह युगुलगीते गायली आहेत. लतादीदींनी ‘आनंदघन’ या नावाने ५ मराठी चित्रपटांना उत्कृष्ट संगीतही दिले आहे. या महान गायिकेने हजारो गाणी गायली आहेत, त्यातील अक्षरश: शेकडो ‘सार्वकालिक सर्वश्रेष्ठ’ आहेत. त्यांचे ‘मालवून टाक दीप’ श्रेष्ठ की ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ श्रेष्ठ यावर लिहिण्यासाठी समीक्षकांच्या लेखण्या सरसावतात. त्यांचं ‘आएगा आनेवाला’ श्रेष्ठ की ‘रसिक बलमा’ त्याहून श्रेष्ठ अशा रसिकांच्या चर्चा आजही रंगतात. ध्वनिमुद्रणाच्या ठिकाणी किंवा रंगमंचावरून गाताना नेहमी अनवाणी होऊनच सादरीकरण करणार्‍या या सरस्वतीच्या सच्च्या उपासक! यांच्या हिंदी-मराठी गीतांची, त्यांच्या सहकलाकारांची (संगीतकार, गीतकार, सहगायक, सहवादक, ज्यांना आवाज दिला, त्या अभिनेत्री) केवळ यादी करणे - हा देखील एक मोठा अभ्यासाचा, संशोधनाचा विषय आहे. खरे तर त्यांच्या एका-एका गीतावर रसिक आयुष्य ओवाळून टाकतात. पण त्यातही त्यांनी गायलेली श्रीगणपतीची आरती; त्यांनी सुरांच्या साहाय्याने मागितलेले ‘पसायदान’, शिवरायांची सावरकरकृत आरती पुढच्या अनेक मराठी पिढ्या ऐकणार आहेत, आणि त्यांचे ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत ऐकून हजार वर्षानंतरचा भारतीय माणूसही भारावून जाणार आहे हे निश्चित!

लता मंगेशकर हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती भारतात आढळणं कठीण आहे. पूर्ण जगभर लतादीदींचे असंख्यचाहते आहेत.लंडन येथील रॉयल अॅल्बर्ट हॉल येथे गाणारी आशिया खंडातील पहिली गायिका असा त्यांचा मान आहे. एकामागोमाग एक असे तीन कार्यक्रम त्याच सभागृहात ‘हाऊस फुल्ल’ गर्दीत यशस्वी करणार्‍या त्या पहिल्या कलावंत आहेत.

लतादीदींना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीसाठी, प्रामुख्याने पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी ‘भारतरत्न’हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्यात आला. तसंच त्यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारही देण्यात आला. महाराष्ट्र शासनानेही राज्य स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार - ‘महाराष्ट्र भूषण’ - देऊन दीदींचा गौरव केला. त्यांना त्यांच्या संगीतातील कामगिरीबद्दल अनेक मान सन्मान व पदव्या मिळाल्या आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची मानद डी. लिट् ही पदवी, खैरागड संगीत विद्यालय, हैद्राबाद विश्वविद्यालयातर्फे डॉक्टरेट, बालाजी मंदिर ट्रस्ट (तिरुपती) येथील ‘विद्वान’ किताब, संकेश्वर येथील शंकराचार्यांकडून ‘स्वरभारती’ हा किताब, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण - अशी असंख्य पुरस्करांची मोठी सूची करता येईल. या जाहीर मानसन्मान आणि पदव्या-पुरस्कारांबरोबरच त्यांचे असंख्य चाहते आणि श्रोते त्यांना ‘स्वरसम्राज्ञी’, ‘गानकोकिळा’, ‘गानसम्राज्ञी’ या अशा उत्स्फूर्त पदव्यांनी संबोधतात. ’Indian Nightingle’ हा किताबही त्यांना देण्यात आला आहे. या अशा एक ना अनेक पुरस्कारांनी मंडित लतादीदी एकप्रकारे आख्यायिकाच बनून गेल्या आहेत.

लतादीदींना पार्श्वगायनासाठी चार वेळा ‘फिल्मफेअर अँवॉर्ड मिळाले आहे. १९६९ नंतर नवीन कलाकारांना संधी मिळावी म्हणून त्यांनी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्या काळात जेव्हा हा एक पुरस्कार मिळणं हे अतिशय प्रतिष्ठेचे समजले जायचे, अशा वेळेला नवीन कलाकारांना संधी मिळण्यासाठी आपला मान बाजूला ठेवण्याची ही लतादीदींची कृती खरोखरच त्यांच्या शालीनतेची ग्वाही देते. दैवी गळ्याबरोबर विशाल मनही लतादीदींकडे आहे याचंच हे द्योतक आहे. त्यांना असंख्य पुरस्कार तर प्राप्त झालेच आहेत, शिवाय त्यांच्या नावाने श्रेष्ठ कलाकारांना पुरस्कारही देण्यात येतात. महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासनातर्फे त्यांच्या नावाने संगीत क्षेत्रात अतुलनीय कार्य करणार्‍या कलाकाराला पुरस्कार दिला जातो.

इतके मानसन्मान, ऐश्वर्य यांच्यासह सतत प्रसिद्धीच्या झोतात असूनसुद्धा स्वत: लतादीदी अत्यंत साध्या आहेत. त्या अत्यंत साधेपणाने राहतात. स्वच्छ परिटघडीची पांढरी साडी, दोन लांब वेण्या, दोन्ही खांद्यावरून पूर्ण अंगभर घेतलेला पदर, विनम्र नाजूक बोलणं, निरागस हास्य (आणि ऐश्वर्याची एकच खूण म्हणून की काय कानातल्या हिर्‍यांच्या कुड्या) असं लतादीदींचं शालीन व्यक्तिमत्त्व पाहिलं की पूर्ण भारतीय शील, संयम, सौंदर्य आणि संस्कृती यांचं चालतंबोलतं प्रतीक म्हणजे लतादीदी,असं प्रतिबिंब प्रत्येकाच्याच मनात उमटतं.

लतादीदी अतिशय संवेदनशील आहेत. मुक्या प्राण्यांवर त्यांचं निरातिशय प्रेम आहे. लतादीदी कमालीच्या ईश्वरभक्त आहेत. त्या मुंबईत त्यांच्या ‘प्रभूकुंज’ या घरी असोत किंवा देशा-विदेशात असोत, त्यांच्या पूजाअर्चा, व्रतवैकल्यात कधीही खंड पडत नाही. त्या ‘आपल्या’ माणसांना खूप जपतात आणि त्यांची प्रेमळपणाने काळजी घेतात. आपल्याबरोबरच्या अगदी ज्युनियर कलावंतांची सुद्धा अगदी घरच्या नातेवाईकासारखी काळजी वाहतात आणि त्यांना बरोबरीची वागणूक देतात. परदेशात त्यांच्याबरोबर दौरा करणार्‍या कलावंतांच्या जणू त्या आईच असतात. इतक्या उंचीवर पोहोचल्यावरदेखील त्या विनम्रशील आहेत. संगीत दिग्दर्शक अनुभवी असो वा नवखा पण त्या एका विद्यार्थ्याच्या भावनेनेच त्या संगीतकाराकडे गाणं शिकतात आणि परिपूर्णतेच्या ध्यासापायी कार्यक्रमापूर्वी किंवा ध्वनिमुद्रणापूर्वी अनेक वेळा गाण्याची तालीम करतात.

लतादीदींना छायाचित्रणाचा विलक्षण छंद आहे. त्या स्वत: उत्तम फोटोग्राफी करतात. वाचन हा लतादीदींचा दुसरा आवडीचा छंद आहे. लतादीदींना क्रिकेटमध्येही खूप रस आहे. जेव्हा शक्य असेल, तेव्हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी त्या स्टेडियमवरही जातात. १९८३ साली तर त्यांनी विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी विशेष कार्यक्रम सादर केला होता. क्रिकेट पंढरी लॉर्डस् स्टेडियमवर त्यांच्यासाठी एक खास कक्ष कायमस्वरूपी आरक्षित करण्यात आलेला आहे.

राष्ट्रभक्ती व सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. कोणाला आर्थिक मदत सढळ हाताने करणे असो किंवा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलचे बांधकाम व व्यवस्थापन असो लतादीदींनी अशा अनेक समाजोपयोगी कार्यांना फार गाजावाजा न करता खूप मदत केली आहे. श्रीकृष्ण, मंगेशी, संत ज्ञानेश्र्वर, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर ही त्यांची श्रद्धा स्थाने आहेत. लतादीदी या प्रखर राष्ट्रभक्त आहेत. युद्धाच्या काळात जवानांच्या मनोरंजनासाठी व निधी उभारणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामाच्या निधी संकलनासाठी कार्यक्रम, बाबा आमटेंच्या कार्याला सहकार्य, गुजरात भूकंपासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींच्यावेळी आर्थिक मदत अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

पूर्ण जगात मंगेशकर घराण्याचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव दुमदुमत ठेवणार्‍या या महाराष्ट्रकन्येविषयी जेवढं लिहावं; या मराठी कन्येची थोरवी जितकी गावी, तितकी थोडीच आहे. म्हणून त्यांच्याविषयी एकच म्हणावसे वाटते -

दिव्यात्वाची जेथे प्रचिती। तेथे कर माझे जुळती।।

आज दिनांक 6 फेब्रुवारी

भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”

“आपल्या लाडक्या लता दीदी यांना आज सकाळी देव आज्ञा झाली, आणि त्या देवाघरी निघून गेल्या त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐🙏🙏

- अभिषेक तिर्लोटकर
मुंबई महाराष्ट्र
8265043527

30/01/2022

30 जानेवारी
महात्मा गांधी निर्वाण दिन

“दे दी हमें आझादी ।

बिना खड्ग बिना ढाल |

साबरमती की संत ।

तुने कर दिया कमाल ।।

तुने कर दिया कमाल ।।”

हे वाक्य ऐकल्याबरोबर आपल्या डोळयासमोर उभे राहतात ते म्हणजे महात्मा गांधी. सत्य आणि अंहिसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वांतत्र्य मिळवून देण्याचे कार्य महात्मा गांधी यांनी केले. साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण म्हणजेच महात्मा गांधीजी होय.

"उनके मीठे थे वादे, और मजबूत थे इरादे,

वो अहिंसा पुजारी, वो स्वेत वस्त्र धारी,

उनकी लंबी सी लाठी, सुदृढ कद और काठी,

इरादे बुलंद थे तूफान हो या अंधी,

दुनिया कहे इन्हें महात्मा गांधी।"

भारतमातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरूष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा, राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहचले.

महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.

त्याच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई हे होते. गांधीजींनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये घेतले तिथे ते खूप अभ्यास करून बॅरिस्टर बनले पुढे भारतमातेची सेवा करण्यासाठी आपल्या मायदेशी परतले.

एकदा जा जेव्हा एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले, तेंव्हा तिथे मोठ्या संख्येने भारतीय मजूर हजर होते. त्यांना इंग्रज लोक अपमानास्पद वागणूक देत होते. गांधीजींनाही अशीच वागणूक इंग्रजांनी दिली. त्यामुळे गांधीजींनी अन्यायाविरूध्द लढण्याचे ठरवले. त्यासाठी सत्य व अहिंसेचा चातुर्याने त्यांनी वापर केला. साधी राहणी व उच्च विचार या तंत्राचा वापर करून गांधीजींनी गोरगरीब जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवले. खेड्याचा विकास, सूतकताई, स्वदेशी, दलितांचा उध्दार, स्वच्छता, स्वावलंबन याकडे लक्ष दिले.

सत्याग्रह, नि: शस्त्र प्रतिकार आणि असहकार आंदोलनाचा स्वीकार करून गांधीजींनी भारतीय जनतेचे ऐक्य, बळ वाढवले. इंग्रजासमोर आव्हान निर्माण केले. त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला; पण गांधीजींनी हार मानली नाही. आपला लढा चालूच ठेवला. चले जाव, भारत छोड़ो अशा घोषणा देत इंग्रजांना त्यांनी सळो की पळी करून सोडले.

पुढे गांधीजींच्या सत्य व अहिंसेपुढे मान झुकवून इंग्रजांनी हार पत्करली. सत्य व अहिंसा हाच माझा धर्म मानणाऱ्या गांधी - जींचा विजय झाला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. गांधीजींचे स्वतंत्र भारत देशाचे स्वप्न साकार झाले. पण दुर्देवाने ३० जानेवारी १९४८ रोजी एका असंतुष्टाने, या थोर महात्म्याची गोळी घालून हत्या केली. गांधीजी जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, विचार प्रत्येक भारतीयास सदैव प्रेरणा देत राहील हे मात्र नक्की ।

अहिंसक मार्गाने सत्याग्रह करून आपल्यावर होणार या अन्यायाचा प्रतिकार करून जुलमी राजवट आपण दूर करू शकतो असा आत्मविश्वास सर्व जगताच्या मनात निर्माण करणार या राष्ट्रपिता म. गांधी यांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रमाण.

- अभिषेक तिर्लोटकर
मुंबई महाराष्ट्र
8265043527

29/01/2022

संत श्री ज्ञानेश्वर

संत श्री ज्ञानेश्वर
‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’

- श्रीस्वरूपानंद स्वामी

संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ७२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!

ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.

‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।

महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’

`प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.

‘शूचीनाम श्रीमतां गेहे, योगभ्रष्टोऽभिजायते’ (भगवद् गीता ६.४१) अशा पवित्र कुळात त्यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. श्री विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. अलंकापुरी (आळंदी) हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले. त्यांचे वडीलबंधू कृपासिंधू निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वेसर्वा होते.

श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवद् गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. (संत ज्ञानेश्र्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली.) या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वरीबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी साहित्य वजा (-) ज्ञानेश्वरी बरोबर (=) शून्य’. तर संत नामदेव महाराज म्हणतात,

‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी।।’

त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकर्‍यांची त्रिकाल संध्याच होय. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, असेच हरिपाठ सांगतो. भक्तीला ज्ञानेश्वरांनी पंचम पुरुषार्थ मानले आहे. ‘कर्मे ईशु भजावा’ हाच त्यांचा कर्मयोग व भक्तियोग आहे. त्यांच्या वाङ्मयाला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष!

`ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात.

‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर संजीवन समाधीनंतरच्या वातावरणाचे वर्णन पुढील यथार्थ शब्दांत करतात. -

‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,

वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’

- अभिषेक तिर्लोटकर
मुंबई महाराष्ट्र
8265043527

26/01/2022

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज

राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक !

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुसलमान, शिंपी, देवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ हे वसतिगृह उभारले.बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. ‘दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही’ अशी घोषणा त्यांनी केली होती. जातिभेदाला महाराजांचा तीव्र विरोध होता. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी बहुजन समाजाची पिळवणूक करणारी कुलकर्णी वतने रद्द केली, तसेच महार कुटुंबांना गुलाम करणारी महार वतनेही रद्द केली.१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९१६ मध्ये निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. ब्रह्मणेतर चळवळीच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत दौरे काढून सभा घेतल्या. राजर्षी शाहूंना ब्रह्मणेतर चळवळीचे उद्गातेच म्हटले जाते. बहुजन समाजाला व (तत्कालीन) शूद्रातिशूद्रांना राजकीय सत्तेतही सन्मानपूर्वक सहभाग मिळावा यासाठी त्यांनी सक्रिय प्रयत्न केले. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी आपल्या कार्यातून सत्यशोधक विचार पुढे नेलाच, शिवाय सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले, पाठिंबाही दिला.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. यातून कलाकारांना राजाश्रय मिळालाच पण मुख्य म्हणजे या कलांचा विकास व विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात (व भारतातही) झाला. काही लेखक, संशोधक यांनाही त्यांनी प्रोत्साहनपर सहकार्य केले. त्यांनी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. युवकांमध्ये व्यायामाची आवड उत्पन्न होण्यासाठी त्यांनी आखाडे, तालमी यांना आर्थिक सहकार्य केले, तसेच कुस्तीला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. कोल्हापूरला ‘मल्ल विद्येची पंढरी’ म्हटले जाते ते यामुळेच.

राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे. शाहू महाराजांच्या सर्वव्यापक कार्यामुळेच कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.

अशा या द्रष्ट्या, पुरोगामी नेत्याचे ६ मे, १९२२ रोजी मुंबई येथे निधन झाले.
- अभिषेक तिर्लोटकर
8265043527
मुंबई महाराष्ट्र

21/01/2022
07/02/2021

🌹 🌷 🌹🌹

Want your business to be the top-listed Shop in Khanivde?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


401305, Virar
Khanivde
401305

Other Shopping & Retail in Khanivde (show all)
Swara Art jwellery Swara Art jwellery
Khanivde, 401305

all type artificial immitationjwellary products available

ALTAF ALTAF
Khanivde, 401305

ANSARI ALTAF

La Torte La Torte
Khanivde, 401305

cake shop

M.B Bajar com M.B Bajar com
Khanivde, 401305

free home delivery

Preya Beautiq Preya Beautiq
Khanivde, 401305

Neelam optic Neelam optic
Khanivde, 401305