Baburaopainter
चित्रकार, शिल्पकार, लेखक, दिग्दर्शक
"आबा गेले !"
"१६ जानेवारी १९५४. बाबुरावांनी देह ठेवला. सूर्योदयाच्याच समयी सूर्यास्त झाला. आबा गेले. मी पोरका झालो."
बाबुरव पेंटर – द विंची ऑफ इंडिया.
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
https://www.facebook.com/127490762372631/posts/470848064703564/
http://chitraakshare.com/2022/01/15/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%87/
बाबुरव पेंटर – द विंची ऑफ इंडिया बाबुरव पेंटर – द विंची ऑफ इंडिया
वास्तुकलाविशारद बाबुराव पेंटर
बाबुराव पेंटारांची तुलना जेव्हा स्वर्गलोक, इंद्रलोक, पृथ्वीलोक हे तिन्ही लोक आणि संपूर्ण बतरह्मांड डिझाईन करणाऱ्या विश्वकर्माशी केली जाते तेव्हा नवल वाटत नाही आणि ज्याने कोणी बाबुरावांनी स्वतः डिझाईन केलेला त्यांचा स्टुडिओ पाहिला असेल त्याला ही कोणती अतिशयोक्ती आहे असं ही अजिबात वाटणार नाही.
त्या काळात जसा स्टुडिओ बाबुराव पेंटरांनी डिझाईन केला आहे तसा स्टुडिओ भारतात आज ही क्वचितच कुठे पाहायला मिळेल.
प्रचंड मोठ्या कॅनव्हासवर कशावर ही न चढता सहज रित्या चित्र कसं काढता येऊ शकतं यासाठी वापरलेलं तंत्र असो की नैसर्गिक प्रकाशाचा वापर करण्यासाठी केलेली प्रकाश योजना असो. काळाच्या एक पाऊल पुढे चालणाऱ्या ह्या चित्रतापसव्याची ती वास्तू तो स्टुडिओ आज जरी पहिला तरी तो काळाच्या खूप पुढचा भासतो.
नमस्कार सगळ्यात आधी सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
आज आम्ही आपल्याला एक अतिशय आनंदाची बातमी देत आहोत. ही गोष्ट कलामहर्षी बाबुराव पेंटर या आपल्या परिवारासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आहे. लवकरच कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्यावरचा ग्रंथ आपल्या भेटीस येत आहे... "चित्राक्षरे प्रकाशित" "मराठी व इंग्रजी" या दोन भाषांमध्ये प्रकाशित होणारा हा ग्रंथ. या ग्रंथाचे काम अद्याप सुरू आहे. तरी ज्या कोणाला असं वाटत असेल की आपण या या स्वरूपातली मदत या कामासाठी करू शकतो किंवा ज्या कोणाला या कार्यात सहभागी व्हायचं असेल, ज्या कोणाला असं वाटत असेल की आपल्याकडे बाबुराव पेंटर यांच्याविषयी काहीतरी सांगण्यासारखे आहे त्यांनी त्वरित संपर्क साधावा...
हा ग्रंथ प्रकाशित होणं ही काळाची गरज आहे. बाबुराव पेंटर हे व्यक्तिमत्त्व नवीन कलारांपर्यंय तसेच सामान्य वाचकांपर्यंत पोहोचावं. त्यांचं कर्तृत्व ह्या आणि ह्यापुढील पिढ्यांना कळावं म्हणून हे गरजेचं आहे.
या ग्रंथाला आपले आशीर्वाद आणि सहकार्य मिळावं ही अपेक्षा !
तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना विनम्र अभिवादन !!!
https://m.facebook.com/story.php?story_fbid=355043889617316&id=127490762372631
बाबूराव पेंटर यांच्या वडिलांबद्दल थोडीशी माहिती...
कोल्हापूर म्हणजे कलेचे माहेरघर. राजश्री शाहू महाराज म्हणजे कोल्हापुरातील कलाकारांना मिळालेलं वरदान. आणि म्हणूनच, चित्रकार असो, शिल्पकार असो, यंत्रवीशारद असो, की गायक असो. ह्या सर्व कलाकार मंडळींनी सजलेलं असं हे कोल्हापूर.बाबुराव पेंटारांच्या ह्या जीवन प्रवासाची सुरुवात होते ती ही ह्या कलानगरीतूनच.
Kolhapur
नमस्कार,
आज कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा जन्मदिवस. खरं तर बाबुराव म्हणजे असामान्य प्रतिभा लाभलेला प्रतिभासंपन्न कलाकार. कोल्हापूरच्याच काय तर संपूर्ण भारतातल्या नव्हे तर जगातल्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक कलाकार. पण त्याचं दुर्दैव हे की ते भारतात जन्माला आले. जर पॅरिस, लंडन, इटली इथे जन्माला आले असते तर त्यांच्या नावाने मोठ मोठी संग्रहालये बांधली गेली असती, त्यांच्या नावाने फिल्म इन्स्टिट्यूट स्थापन केले गेले असते, स्कॉलरशिप असत्या, त्यांच्या पुस्तकात तर त्यांचा इतिहास असताच पण आपल्या ही पुस्तकात त्यांचा उल्लेख केला गेला असता, पिकासो, लिऑनारडो, व्हॅन गॉग अशा जागतिक कीर्तीच्या कलाकारांमध्ये त्यांची गणना केली गेली असती. पण दुर्दैव त्याचं की चुकून हा कलाकार भारतात जन्माला आला. आणि आज बाबुराव पेंटर फक्त कोल्हापूर पुरतेच मर्यादित राहिले.
दर वर्षी जयंती आली पुण्यतिथी आली की facebook, instagram वर पोस्ट करायच्या. झालं संपलं. आपल्या देशातले असे अनेक कलावंत आहेत ज्यांच्या वाट्याला कायम उपेक्षाच आली. जिवंतपणी आणि मेल्यावर ही. कारण त्यांचं नाव लोकांसमोर यावं, जागतिक पटलावर झळकावं यासाठी आपण काहीच केलं नाही, करावंसं ही वाटलं नाही.
बाबुरावांवर पाहायला गेलं तर त्यांचं चरित्र कला महाविद्यालयांमध्ये, फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये अभ्यासासाठी असायला हवं, पण त्यांच्यावर मोजून मराठीत दोन पुस्तकं लिहिली गेली ती ही आज मिळणं मुश्किल झालय. आज अनेक कला शिक्षण घेणाऱ्यां विद्यार्थ्यांना आणि काही सो कॉल्ड आर्टिस्ट ना सुद्धा बाबुराव माहीत नाहीत हे वास्तव आहे.
आज म्हणूनच आम्ही हे आवाहन करतो, ज्यांना कोणाला बाबुरावांविषयी काही करावंसं वाटत असेल, लिहावंसं वाटत असेल, कोणाला काही माहिती असेल तर निःसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधून आपण सर्वांनी एकत्र येऊनच कलामहर्षींच नाव जगासमोर यावं यासाठी प्रयत्न करूयात हे.
हेच सगळं डोक्यात ठेऊन एक वर्षापूर्वी बाबुराव पेंटर हे page ओपन केलं. त्यासाठी अनेकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत झाली.तुम्ही सर्वांनी या page विषयी आणि आबांविषयी असलेल्या प्रेमाखातर page ला like केलंत, पोस्ट share केल्यात, आवडलेल्या पोस्ट वर कॉमेंट केल्यात काही चुकीचं वाटल्यास ते ही बोललात आणि तुमच्या सर्वांमुळेच आज हे page राहिलेलं नसून एक कुटुंब झालय... बाबुरावांच कुटुंब... आपल्या आबांचं कुटुंब.
आज बाबुरावांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रति आदर व्यक्त करत आपण आपल्या Baburaopainter या page साठी एक लोगो release करीत आहोत. तुम्हाला हा लोगो कसा वाटला हे जरूर कळवा. आणि तुमचं या कुटुंबावरचं प्रेम असंच कायम राहुद्या...
Calligraphy - Ankita pawar (calliwaves)
https://www.facebook.com/profile.php?id=100042060630499
https://instagram.com/calliwaves?utm_medium=copy_link
Illustration - Chitraakshare
https://www.facebook.com/neelnileshnaik/
https://instagram.com/_.chitraakshare._?utm_medium=copy_link
Logo design - Harshwardhan Jadhav
https://instagram.com/sukhi.bhel?utm_medium=copy_link
https://www.facebook.com/harshavardhan.jadhav09
बाबुराव नावाचे विद्यापीठ
बाबुरावांनी आपल्याकडचं ज्ञान, आपल्याकडे असलेली कला इतरांना देऊन ज्ञानदानाचं जे कार्य केलं त्यातून अनेक हिरे भारतीय चित्रपट आणि एकंदरीत संपूर्ण भारतीय कलाविश्वाला लाभले. महाराष्ट्र फिल्म कंपनी फक्त कंपनी नव्हती तर अप्रत्यक्षपणे पाहता ती एक फिल्म अकॅडमी होती. पण आज अशा माणसाचं कार्य व नाव विसरल्यात जमा आहे. ज्याने भारतीय चित्रपटसृष्टीस मोठं केलं आज त्या महान कलाकाराचं नाव इंडस्टरीतील लोक ही घेत नाहीत याने मन दुःखी होते.
बाबा गजबर म्हणजे बाबुरावांची सावलीच. ते बाबुरावांविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात, "बाबुरावांनी ज्या प्रकारे कलाज्ञान शिकवले, त्याचप्रमाणे वेदांत विषय ही शिकविला. ते एक धीरगंभीर महात्माच होते. बाबुरावांनी पुष्कळ लोकांना आर्थिक मदत केली. कलेचं दान करणाऱ्याला पैशाची किंमत नसते. या ध्येयवादी कलामहर्षीच्या आठवणीने तरुणांना मार्गदर्शन खचित होईल. पण ज्यांनी त्याच मार्गदर्शनाने आज सुयश गाठले, अशा त्यांच्या शिष्यांनी आज पुढाकार घेऊन बाबुरावांच्या स्मरणार्थ चित्रकला व चित्रपटकलेसाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता अकॅडमी सुरू करावी, म्हणजेच बाबुरावांचे कार्य पूर्ण केले असे मी समजेन."
आज ही बाबुरावांकडून आपल्या सारख्या असंख्य जणांना मार्गदर्शन मिळत आहे. आपण आज ही त्यांच्याकडून चित्रकलेचे, चित्रपटाचे आणि कलाकाराने कसे असावे याचे धडे घेत आहोत. त्या अर्थी आपण त्यांचे शिष्यच आहोत. आणि म्हणून आज तरी बाबा गजबरांच हे म्हणणं आपण सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते सत्यात उतरविले पाहिजे. असे मनापासून वाटते.
Thanku for love & Support Family...😇🤗
चित्रपट कसा असायला हवा यावर बाबुरावांचे विचार...
आनंदराव पेंटारांचे चिरंजीव चित्रकार, कला दिग्दर्शक, दिग्दर्शक व निर्माते श्री. वसंत पेंटर हे बाबुरावांच्या बद्दल बोलताना सांगतात.
चित्रपटात वास्तवता असावी, आशा विचारांचे बाबुराव होते. ते नेहमी सांगत, "वास्तवतेचा आभास निर्माण व्हावा इतपतच कलेत कृत्रिमता आली तर चालते, पण निव्वळ तंत्राच्या सोयीसाठी वातावरणाची व दृश्याची नासाडी करू नका." त्याचप्रमाणे चित्रपटातील गाण्यांवर व संवादातिरेकावर फार मोठा रोष होता. वास्तव जीवनाशी अगदी विसंगत या गोष्टी आहेत. निवळ वातावरणाला पूरक असे पार्श्वसंगीत देऊन काढलेला 'थिफ' हा चित्रपट त्यांना फार आवडला होता.
जिथं बोललं पाहिजे तिथं संवाद असू द्या. चित्रपटात चित्रमय वातावरणाला वाचा फुटायला हवी (गाण्यासाठी हवा तर स्वतंत्र चित्रपट काढा) आज जग वास्तवतेकडे सरकत असताना आपण धेडगुजरी चित्रपट निर्माण करणं यात आपल्या देशाचा घात आहे. संपत्तीचा अपव्यय व स्वतःची फसवणूक आहे. असं ते म्हणत.
आज Comercial films आणि Art films असे दोनही प्रकारचे चित्रपट आणि तसे दिग्दर्शक आपल्याकडे आहेत. बाबुरावांचं चित्रपटविषयीच हे मत आजच्या तरुणांना जे या क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. फक्त चित्रपट सृष्टीत कार्यरत असलेल्यांनीच नवे तर इतर तरुण-तरुणींनी (प्रेक्षकांनी) सुद्धा यावर विचार करणं आवश्यक आहे. असं वाटतं.
कलाविश्वाला ऊर्जा देणाऱ्या सूर्याचा "सूर्यास्त"
१६ जानेवारी १९५४ पहाटेचे पाच-साडे पाच वाजले असतील. बाबुराव त्यांच्या स्टुडिओत आरामखुर्चीवर समोरच्या खिडकीकडे नजर खिळवून बसले होते. खोलीत माई, रवींद्र आणि मुलं खिडकीकडे एकटक बघत बसलेल्या बाबुरावांवर लक्ष ठेवून बसली होती. कारण प्रसंगच तसा घडला होता. काल रात्री डॉक्टर येऊन गेले होते. बाबुरावांच्या छातीत कसंतरीच होत होतं म्हणून रवींद्र डॉक्टरांना घेऊन आला होता. डॉक्टरांनी एक इंजेक्शन देऊन काळजी करण्याचं कारण नाही, पण विश्रांती घेण्यास सांगितलं होतं. आणि बाबुरावांवर लक्ष ठेवा आणि त्यांना झोपू देऊ नका हे ही बजावलं होतं. सगळेच काळजीत होते... रात्र कशीतरी सरली. पण अजून सूर्योदय झाला नव्हता. इतक्यात बाबुरावांना ठसका लागला आणि त्यांचा उजवा हात छातीवर गेला. रवींद्र काही न बोलताच डॉक्टरांना आणायला गेला पण...पण रवींद्र डॉक्टरांना घेऊन येणार त्याआधीच... बाबुरावांनी डोळे मिटले... कोल्हापुरातल्या त्यांच्या स्टुडिओत कलामहर्षी बाबुराव पेंटर ह्यांनी आपला प्राण सोडला. सूर्योदयाच्या समयीच सूर्यास्त झाला. रवींद्रचे आबा गेले. संबंध भारतीय चित्रपटसृष्टीवरचं छत्र हरवलं. बाबुरावांनी घडवलेला तो कॅमेरा... तो पोरका झाला. कोल्हापुरातला नव्हे भारतातला नव्हे तर जगातला एक महान कलाकार आज हे जग सोडून गेला होता.
पण सूर्य अस्ताला जरी गेला असला. सूर्यास्त जरी झाला असला तरी सूर्य होता. त्याचं तेज कायम होतं. आज ही आहे. अनेक कलाकारांना घडवणारा आज ही आपल्यासारख्या अनेक कलावंतांना प्रेरणा देतोय. संपूर्ण कालाविश्व व्यापून राहिलेला तो विश्वकर्मा आज ही ह्या कलाविश्वात किर्तीस्वरूपात आहे. आणि जोपर्यंत कला शाबूत आहे तोपर्यंत कलामहर्षी आहे.
शेवटच्या क्षणी बाबुराव रवींद्रला म्हणाले होते, "बाबा, उरलेलं काम पूर्ण कर..." हे बाबुरावांचं शेवटचं सांगणं फक्त रवींद्र ह्यांच्यासाठी नसून तुमच्या आमच्यासाठी आपल्या प्रत्येकासाठी होतं. बाबुरावांसारखा कलावंत कधी झाला नाही पुढे होणार नाही...
आज पुण्यतिथीनिमित्त बाबुराव पेंटर ह्यांना विनम्र अभिवादन...
कलानगरीचा राजा पुण्यनगरीत !
सावकारी पाश पूर्ण झाला. एका महिन्यात चित्रपट बनवून पुर्ण करण्याचा विक्रम बाबुरावांनी करून दाखवला. हा चित्रपट पुण्या-मुंबईत प्रदर्शित झाला. पुण्यात बाबुरावांच्या शिष्यांनी ही आपल्या गुरुजींचा चित्रपट म्हणून तो आवर्जून पाहिला आणि त्यांना बाबुरावांच्या कल्पनाशक्तीच्या सामर्थ्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. आणि ते सामर्थ्य अजून आपल्या पंखांमध्ये नाही हे ही कळून चुकलं. सावकारी पाश पाहिल्यावर आपण बाबुरावांचे शिष्य म्हणून त्यांना अभिमान वाटलाच पण पूर्वीचे गैरसमजाचे सगळे पाश तुटले आणि ह्या पाच ही शिष्यांनी बाबुरावांना पुण्यास येऊन प्रभातला भेट देण्याचं निमंत्रण दिलं.
कलानगरीचा राजा पुण्याच्या पुण्यनगरीत आला. बाबुराव पुण्यात आले. त्यांनी संपूर्ण प्रभात स्टुडिओ पाहिला आणि आधुनिक साधनांनी सजलेला स्टुडिओ पाहून बाबुरावांना आनंद तर झालाच पण आपल्या शिष्यांचा अभिमान वाटला.
जगातील सर्वश्रेष्ठ कलावंतांपैकी बाबुराव ! कलानगरीचा राजा ! कलामहर्षी ! त्यांनी आपल्या प्रभात स्टुडिओला भेट देणं हा आनंदाचा क्षण तर होताच. पण असा योग पुन्हा येणं ही दुर्मिळ. म्हणून चार ही शिष्यांनी बाबुरावांबरोबरच्या अनेक आठवणींपैकी ही एक आठवण म्हणून त्यांनी बाबुरावांसोबत एक फोटो काढला. आणि तो गुरू-शिष्यांचा फोटो आज ही आपल्याला पाहायला मिळतो.
( हे पाच शिष्य आणि फोटोत जे आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे एस. फतेलाल, केशवराव धायबर, सीताराम कुलकर्णी, व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले.)
रवींद्र मेस्त्री
"समोर ईजलवर कॅनव्हास ठेवला होता. आणि वीस एक वर्षासा मुलगा आपल्या आबांचं (वडिलांचं) पोर्ट्रेट पैंटिंग करीत होता. तो ज्यांचं चित्र काढतोय त्या त्याच्या आबांचं कालच निधन झालं होतं. हा मुलगा म्हणजे रवींद्र मेस्त्री आणि त्याचे आबा म्हणजे कलामहर्षी बाबुराव पेंटर..."
रवींद्र मेस्त्री म्हणजे कलाविश्वातलं एक महत्त्वाचं पण वाडीलांप्रमाणेच विस्मृतीत गेलेलं नाव. रवींद्र मेस्त्री ह्यांना लहानपणी सगळे बबेराव म्हणत. ते लहानपणापासून कायम बाबुरावांसोबत असत. जिथे बाबुराव तिथे बबेरव. त्यामुळे त्यांना सगळे बाबुरावांचं शेपूट म्हणत.
रवींद्र यांचा स्वभाव काहीसा आपल्या वाडीलांसारखाच होता. मितभाषी, प्रसिद्धी पासून अलिप्त, कसल्याही गोष्टीचा गर्व नाही की कसला बडेजाव नाही. त्यांना गाडी चालवण्याची आणि शिकारीची फार हौस. वरसाने मिळालेली कला तर होतीच. त्यामुळे बाबुरावांनी त्यांना जे जे मध्ये धाडलं. तिथे ते पाच तासांच life painting चाळीस मिनिटात पूर्ण करत आणि उरलेला सगळा वेळ बाकीच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्यात घालवत. पण कॉलेजच्या प्रदर्शनात ह्या चाळीस मिनिटात साकारलेल्या चित्रास पाहिलं बक्षीस मात्र हमखास मिळत. जे जे मध्ये दोन वर्ष चित्रकलेचं शिक्षण घेऊन रवींद्र, वडिलांच्या कामाला हातभार म्हणून कोल्हापूरला परत आले.
रवींद्र चित्रकार होतेच पण शिल्पकार ही कमालीचे होते. कोल्हापूरच्या प्रवेश द्वारावरचा तारा राणीसाहेबांचा पुतळा असो किंवा पन्हाळ्यावरचा बाजीप्रभुंचा पुतळा ही शिल्प साकारणारे शिल्पकार रवींद्र मेस्त्रीच. बाबुरावांचा अर्धवट राहिलेला महात्मा गांधिंचा पुतळा हा रवींद्र मेस्त्री यांनीच पूर्ण केला.
“माणसाच्या आयुष्यात त्यांच्या चांगल्या दिवसात अनेक लोक त्याच्या सोबत असतात पण वाईट प्रसंगात ती सगळी लोकं पाठ फिरवतात. आपल्या वाईट प्रसंगात आपण एकटे असतो हे जे आपण ऐकतो ते रवींद्र मेस्त्री असो की भारतीय चित्रपटसृष्टीचे चालक, भारतीय सिनेमाचे भाग्यविधाते, रवींद्रचे वडील कलामहर्षी बाबुराव पेंटर असो. दोघांनीही हे अनुभवलं.
बाबुरावांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्यावर त्यांच्याच एकेकाळच्या मित्रांनी, निकटवर्तीयांनी एवढंच काय तर ज्यांना बाबुरावांमुळे जग ओळखू लागलं अशा त्यांच्या शिष्यांनी ही त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. जे थेट टीका करत नव्हते ते बाबुरावांच्या बाजूने बोलत ही नव्हते. सगळं दिसत आणि ऐकायला येत असून ही त्यांनी डोळे आणि कान बंद करून घेतले होते. बाबुरावांनी आपल्या आयुष्यात अनेकांना घडवलं, ते अनेक जणांना खूप काही देऊन गेले. पण घरच्यांसाठी मागे ठेवलं ते पन्नास साठ हजारांचं कर्ज. आणि हे सगळं सावरलं ते रवींद्र मेस्त्री यांनी. पेंटरांवर अशी भयानक परिस्थिती ओढवलेली असताना, अवाढव्य कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना. ज्या लोकांवर बाबुरावांचे सात जन्मात ही न फेडण्यासारखे ऋण होते त्या माणसांनाही पेंटरांकडे पाठ फिरवली होती.
बाहेर सगळीकडून टीका होत असताना ही बाबुराव शांत होते, स्थिर होते, आणि ह्या टिकेकडे दुर्लक्ष करत होते. जणू काही त्यांना कसलाच फरक पडत नव्हता. बाबुराव असोत की रवींद्र , दोघे ही पिता-पुत्र एखाद्या तापसव्यासारखे आयुष्य जगले. ते कलेचे तपस्वी होते. ते खरच महर्षी होते...कलामहर्षी !
...आणि चित्रकार बाबुराव पेंटर
बाबुराव चित्रकार म्हणून कसे होते ? हे सांगणारा एक प्रसंग आहे. चित्रकाराची नजर कशी असावी कींवा बाबुरावांचा कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता ते सांगणारा हा प्रसंग.
बाबुराव रोज सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारायला जायचे. सकाळी त्यांच्यासोबत शंकरराव भुते असायचे आणि संध्याकाळी बाबुराव पेंढारकर. संध्याकाळी बाबुराव अगदी न चुकता कुंभार गल्लीतल्या सरस्वती दत्त मंदिरात दत्तगुरूंच्या दर्शनास जात. अशाच एका दिवशी बाबुराव आणि पेंढारकर मंदिराच्या दिशेने चालत असतानाच. समोरच्या त्याच कुंभार गल्लीतून त्यांना एक स्त्री पुजेचं ताट हातात घेऊन येताना दिसली. दोघांचीही ओघवती नजर तिच्यावर पडली. दोघांनीही तिला पाहिलं. ती स्त्री मात्र नाकी डोळी देखणी होती. पण ह्यावर कोणी काही बोललं नाही. ती चालत आपल्या वाटेने निघून गेली. बाबुराव आणि पेंढारकर ही मंदिरात गेले.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फिरायला जायला बोलावण्यासाठी पेंढारकर बाबुरावांच्या खोलीत आले. समोरच इझलवर नावीन कोरा कॅनव्हास आणि त्यावर नवीन चित्र रेखाटण्यात बाबुराव रमले होते.
"शेट नवीन पैंटिंग करताय ?"
पेंढारकरांच्या आवाजाने बाबुरावांची चित्रसमाधी तुटली, "अरे तुम्ही आलात होय ?फिरायला जायचय ना ? पैंटिंग करताना किती वाजले ते कळलंच नाही...बाकी कसं झालंय कंपोझीशन ?" बाबुरावांनी पेंढारकरांना विचारलं. बाबुरावांची एक सवय होती, नवीन पैंटिंग केलं असेल किंवा नवीन पैंटिंग चालू असेल तर बाबुराव ते कसं झालंय ते पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारत. अगदी न्हाव्याला सिद्धा. धोंडिबा टिपूगडे म्हणून एक न्हावी बाबुरावांचे केस कापायला यायचा. कधी जर तो आला आणि बाबुराव पैंटिंग करत असतील तर बाबुराव त्याला ही "काय धोंडिबा कसं वाटतंय चित्र ?" असं विचारत. आणि तो ही चित्रात काय कमी आहे, चित्रात अजून काय हवंय, चित्र कसं वाटतंय, हे सांगत. हे विचारण्यामागचा बाबुरावांचा हेतू हाच की पाहणाऱ्याला(प्रेक्षकांना) आपली कलाकृती भावते आहे का हे तपासणं. आणि ह्यामुळेच बाबुरावांचे चित्र असो की चित्रपट. पाहणाऱ्याला ते नेहमीच भावले.
तर त्यादिवशी असाच प्रश्न बाबुरावांनी पेंढारकरांना विचारला. चित्र एका स्त्रीचं होतं. पेंढारकरांनी ते चित्र पाहिलं आणि एका क्षणात त्यांनी ओळखलं. "ही तर तीच स्त्री. काल दत्त मंदिरात जाताना आपल्याला दिसलेली..."
स्वतः कॅमेरा बनवणाऱ्या बाबुरावांचे दोन डोळे म्हणजे ही जणू कॅमेरेच होते. हुबेहूब तशीच दिसणारी, तेच सौंदर्य, तेच लावण्य, चेहऱ्यावरील तेच सात्विक भाव. बाबुरावांनी कॅनव्हासवर उतरवले होते.
त्या स्त्रीचच रूपांतर चित्रात झालं की काय असं वाटावं. असं ते हुबेहूब चित्र बाबुरावांनी समोर कोणतीही मॉडेल न ठेवता रेखाटलं होतं.
पुढे बाबुरावांची कीर्ती पाहता मुंबईच्या ज. जी. कला महाविद्यालयाकडून ही (J J School of art) बाबुरावांचा सन्मान केला गेला.
बाबुरावांची चित्र सामान्य माणसाच्या मनाला भावणारी आहेत. बाबुरावांच्या चित्रांमध्ये लावण्य आणि भारतीय स्त्रीचे सात्विक सौंदर्य ह्याला तोड नाही.
बाबुरावांनी साकारलेलं लक्षुमीचं आणि दत्तात्रेयांचं चित्र पाहिलं तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसासारखिच त्यांची देहरचना, सामान्य देहबोली, आणि दिसायला साधी दिसतात पण तरीही त्यातील न दिसणारं देवत्व मात्र मनाला भावतं.
बाबुरावांची चित्रकला बाबुरावांच्या चित्रपटांसाठी सुद्धा कायम पोषकच ठरली. बाबुराव स्वतः चित्रपटातील पात्र कशी असावीत त्यांची वेशभूषा कशी असावी, चित्रपटातील दृश्य कशी असावीत, नेपथ्य काय आणि कसं असावं हे सगळं स्वतः डीझाइन करीत. त्यांची स्केच करीत आणि त्यांच्या स्केचेस नुसार सगळं तयार केलं जाई.
बाबूरांकडून अनेकांनी जसे चित्रपटाचे धडे गिरवले तसेच चित्रकलेचे ही ज्ञान बाबुरावांकडून अनेकांनी घेतले. आणि आज ही बाबुरावांकडून आणि त्यांच्या चित्रांमधून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे. दिग्दर्शक, निर्माते, यंत्रविशारद, लेखक, शिल्पकार आणि चित्रकार बाबुराव पेंटर ह्यांचा नवोदित चित्रकारांनी अवश्य अभ्यास करावा...
झुंजारराव बाबुराव...
बाबुराव गोपाळ पेंढारकर
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता बाबुराव पेंढारकर. आपल्या ४५ वर्षांच्या कार्यकिर्दीत सुमारे पन्नासहुन अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा हा मनस्वी कलाकार. बाबुराव पेंटर आणि बाबुराव पेंढारकर ह्यांचे भेट झाली ती सैरंध्री चित्रपटाच्या निमित्ताने. सैरंध्री ह्या चित्रपटाच्या शेवटच्या कृष्ण दर्शनाच्या सीनमध्ये पेंढारकरांना कृष्णाची भूमिका साकारायला दिली होती. इथूनच खऱ्या अर्थानं बाबुराव पेंढारकरांच्या कार्यकिर्दीची सुरवात झाली.
तेव्हा पेंढारकरांचे वय साधारण तीस एक वर्षाचे असेल.
काहींना हे ठाऊक असेल, काहींना नसेल. ज्यांना ठाऊक नसेल त्यांना सांगायला आवडेल की, आज आपण film distribution, film promotion, marketing हे जे सगळं पाहतो त्याची सुरुवात ही "बाबुराव पेंटर" ह्यांनी केली होती. आणि "बाबुराव पेंढारकर" हे सुरुवातीला हा सगळा पत्रव्यवहार व वितरणाचा व्याप सांभाळत होते.
पुढे पेंढारकरांनी "प्रभात" साठी काम करायला सुरुवात केली. एवढंच काय तर "प्रभात" हे नावच मुळात पेंढारकरांनी सुचवलं होतं. प्रभातचे ते मॅनेजर होते. पुढे प्रभात पुण्याला हलवण्याचं ठरलं, पण पेंढारकरांनी कोल्हापूर सोडलं नाही. भलजींनी आणि निंबाळकरांनी "कोल्हापूर सिनेटोन कंपनी" काढली आणि पेंढारकर त्याचे मॅनेजर झाले. पण नंतर सिनेटोन मधून ही ते बाहेर पडले व पांडुरंग नाईक ह्यांच्या मदतीने ऱ्यांनी हंस पिक्चर्स ही कंपनी सुरू केली.
पेंढारकरांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले, अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि चित्रपटांची निर्मिती ही केली.
पेंढारकरांचा अभिनय हा एका साचातला, ठराविक भूमिकांपुरता मर्यादित कधीच नव्हता. त्यांनी अनेक रंगी, विविध पात्र साकारली. आचार्य अत्रेंच्या महात्मा फुले ह्या चित्रपटातले ज्योतिबा तर त्यांनी हुबेहूब साकारले होते.
बाबुराव पेंढारकर हा अतिशय शिस्तप्रिय पण मनस्वी कलाकार होता. मराठी व हिंदी चित्रपटांसोबतच त्यांनी रंगभूमीवरही आपल्या पावलांचे ठसे उमटवले. रंगभूमीवर त्यांनी साकारला तो झुंजारराव.
स्वतः पेंढारकरांनी लिहिलेले "चित्र आणि चरित्र" हे आपले आत्मचरित्र सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे. सर्वांनी ह्यांचा आदर्श घ्यावा असे हे "झुंजारराव बाबुराव".
पण अशा ह्या "झुंजारराव बाबुरावांची" ही सुरवात झाली ती "कलामहर्षी बाबुरावांपासूनच" हे ही तितकंच खरं...
दत्तात्रेय बळवंत पाटील म्हणजेच बाबा गजबर. ह्यांचा आणि बाबुरावांचा पहिला परिचय झाला तो श्रीपती काकडे याच्या टेलरिंग शॉपच्या फॅशन प्लेट वरच्या चित्रांमार्फत.
बाबा गाजबर हे कमालीचे चित्रकार. त्यांची हीच कला पाहून राजश्री शाहू महाराजांनी त्यांना कलेचे रीतसर शिक्षण घेण्यासाठी तीन रुपयांची स्कॉलरशिप ही दिली होती.
बाबा गाजबर हे श्रीपती काकडे ह्यांच्या फॅशन प्लेटसाठी पैंटिंग्ज काढत. एके दिवशी बाबुरावांनी ही काचेवरची चित्र पाहिली. त्यांनी बाबांना भेटण्यासाठी बोलावले. बाबांची ही बाबुरावांना भेटण्याची, पाहण्याची खूप दिवसंपासूनची इच्छा होती. ती पुर्ण झाली. एवढंच काय तर पुढे आयुष्यभर बाबा सवलीसारखे बाबुरावांच्यासोबत राहिले. आनंदराव गेले तेव्हा खचलेल्या बाबुरावांना वडीलकीच्या अधिकाराने धीर देणारे हे बाबाच होते. बाबा त्यांच्या दोन मुलांसह कंपणीतच राहत. कंपनीतील सर्वांपेक्षा बाबा वयाने वडील. कंपनीतील सगळेच त्यांचा मान राखत, त्याचं ऐकत. कंपनीत कोणाचे मतभेद झाले तर बाबा त्यांचा निवाडा करीत. बाबांचा शब्द हा शेवटचा शब्द असायचा.
कंपनीवर, बाबुरावांवर अनेक सुखाचे...दुःखाचे प्रसंग आले तेव्हा बाबा गजबर हा माणूस बाबुरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.
बाबुरावांच्या पहिल्या पत्नींच अकाली निधन झालं. बाबुराव कंपनीचा प्रपंच समर्थपणे सांभाळत होते पण संसाराचं काय ? तेव्हा बाबांनीच बाबुरावांचं दुसरं लग्न जमवण्यासाठी पुढाकार घेतला. बाबुराव ही बाबांचं सगळं ऐकत. बाबुरावांनी दुसरं लग्न केलं पण घर ? बाबुरावांना स्वतःचं घर होतं कुठे ? जे होतं ते सगळं महाराष्ट्र फिल्म कंपनी उभारण्यात खर्ची झालं होतं.
अशावेळी बाबा गजबरांनी स्वतःसाठी घेतलेलं नवीन घर बाबुरावांना राहण्यासाठी दिलं. त्याच घरात बाबुरावांच्या पत्नी लक्षुमिबाई ह्या गृहलक्ष्मीचा गृहप्रवेश झाला. आणि बाबा ! बाबा मात्र कंपनीतच राहू लागले. पुढे जेव्हा बाबुरावांनी स्वतः घर घेतलं तेव्हा बाबा आपल्या घरी राहायला गेले.
बाबुरावांसाठी बाबा हे पित्यास्थानी होते पण बाबांनी वयाने मोठे असून ही बाबुरावांना कायम गुरुस्थानीच मानलं. अशी विलक्षण माणसं आणि अशी विलक्षण निष्ठा आणि प्रेम असलेली नाती हल्ली दिसून येत नाहीत.
बाबा स्वभावाचे सात्विक होते, निर्मळ मनाचे होते, अध्यात्मिक होते. स्वामी विवेकानंद म्हणजे त्यांचं दैवत. स्वच्छ पांढरशुभ्र धोतर नेसलेला, फांढरा कोट घालणारा हा माणूस मनाने सुद्धा तसाच राहिला.
बाबा हे महाराष्ट्र फिल्म कंपनीचे खजिनदार होते पण उभ्या आयुष्यात स्वतःसाठी त्यांनी कंपनीचा एक पैसा ही खर्च केला नाही. स्वखर्चासाठी ते ओब्राईन टेक्निकल स्कूलमध्ये कलाशिक्षकांची नोकरी करत. असा निस्वार्थी, निर्मळ मनाचा विलक्षण माणूस हल्लीच्या जगात भेटणं अशक्यच.
टिप : बाबांचं छायाचित्र मिळाले नसल्याने वर्णनात्मक चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे.
खुप मनापासून आभार🙏💕
शांताराम राजाराम वणकुद्रे हे कोण माहितीय ? काहींनी ओळखलं असेल काहींनी नसेल. शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच भारतीय चित्रपट सृष्टीत ज्यांचे अढळ स्थान आहे असे "चित्रपती व्ही. शांताराम." भविष्यातील ह्याच "चित्रपतींची" सुरुवात झाली ती "कलामहर्षींपासून".
जेव्हा शांताराम महाराष्ट्र फिल्म कंपनीत आला तेव्हा तो १८-१९ वर्षाचा असेल. बाबुराव पेंढारकरांचा तो मावसभाऊ. शांताराम हा अतिशय बुद्धिमान, कल्पक व कष्टाला पुरून उरणारा होता. त्याची एखादं काम करण्याची हातोटी नि चिकाटी मोठी होती. अल्पावधीतच तो बाबुरावांचा लाडका शिष्य बनला आणि शांतारामच्या मनात ही बाबुरावांबाबद्दल नितांत आदरच होता. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या "वत्सलाहरण" ह्या चित्रपटासाठी बाबुरावांनी शांतारामची निवड श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी केली. शांतारामनी श्रीकृष्णाची भूमिका उत्तम साकारली. पण तेव्हा कंपनीतील सर्व जण पडेल ती कामं करत. त्यात शांताराम नेहमीच पुढे असायचा. जेवणाची वेळ झाली की शांताराम कृष्णाच्या पेहरावातच लोकांना जेवण वाढण्याचं ही काम करायचा. हळू हळू त्याने सुतारकामापासून फिटरकामापर्यंत सगळी कामं केली. फातेहलाल आणि दामले ह्यांनी दिग्दर्शित केलेला "महारथी कर्ण" ह्या चित्रपटाचं एडिटिंग शांताराम आणि धायबर ह्यांनीच केलं होतं. महारथी कर्ण ची ५० हजार फुटांची फिल्म शांतारामनी १२-१३ हजार फुंटावर आणली होती. "चित्रपटात काय ठेवायचं आणि काय कापायचं हे ही चित्रपटाच्या दिग्दर्शनाइतकच महत्वाचं असतं." हे बाबुराव नेहमी म्हणत. आणि बाबुरावांचं प्रत्येक वाक्य शांताराम स्मरणात साठवून ठेवत. शांतारामला चित्रपट दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली ती ही बाबुरावांमुळेच. तो चित्रपट होता, "नेताजी पालकर".
पुढे शांतरामनी महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडून प्रभातसाठी काम केले. व्ही शांताराम ह्यांचं चित्रपट सृष्टीतील कार्य आपल्या सर्वांना ठावे आहेच. त्यांचं मराठीच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान सर्वश्रुत आहे. पण ह्या "चित्रपतीची" चित्रपटश्रुष्टीत रुजवात झाली ती बाबुरावांच्या तालमितील कसदार तांबड्या मातीतूनच.
व्ही शांताराम ह्यांच्या घरात एका भिंतीवर एक तसबीर कायम होती ही तसबीर कोण्या देवाची, कोण्या क्रांतिकारकाची नव्हती. ती ताजबीर होती "कलामहर्षी बाबुराव पेंटर ह्यांची." बाबुरावांची ही तसबीर शांतरामांच्या घराच्या भिंतीवर होतीच पण बाबुरावांची प्रतिमा त्यांच्या मनावर ही कायमस्वरूपी कोरलेली होती.
आज स्वातंत्र्यदिन. देशाला स्वतंत्र होऊन आज ७४ वर्ष पूर्ण झाली. देशास स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्टा केली. काहींनी आपल्या मनगटाच्या जोरावर इंग्रजांशी दोन हात करून आपले रक्त सांडून स्वातंत्र्यासाठी आपले प्राणार्पण केले, काहींनी अहिंसेचे तत्व बाळगून स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान दिले, काहींनी आपल्या लेखणीच्या जोरावर तीक्ष्ण व धारधार शब्द वापरून ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले. तर काहींनी आपल्या कलेच्या जोरावर पारतंत्र्यात राहायची सवय झालेल्या व स्वातंत्र्याचा विसर पडलेल्या समाजाच्या मनात स्वातंत्र्याचा विचार रुजविण्याचे कार्य केले.
भालजी पेंढारकर हे त्यातलेच एक. भालजी पेंढारकर म्हणजेच भालचंद्र गोपाळ पेंढारकर हे चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्यापूर्वी पुण्यामध्ये केसरीसाठी लिखाण करीत. पोरवयापासूनच ते क्रांतिकारी विचारांचे, देशासाठी काही करू पाहणारे असे होते. आणि हे त्यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये दिसून ही येतं.
भालजी आणि बाबुरावांची भेट झाली ती "मार्कंडेय" ह्या चित्रपटाच्या निमित्ताने. बाबुरावांनी मार्कंडेय चित्रपटाचं लिखाण भालजींवर सोपवलं होतं. बाबुराव आणि भालजी ही दोन भिन्न विचारांची माणसं होती. बाबुरावांचा कल कला आणि कलात्मकतेकडे जास्त होता तर भालजींचे क्रांतिकारी विचार होते. काही कारणास्तव मार्कंडेयचे लिखाण अपुरे राहिले.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वराज्य मिळालं पण सुराज्याचं काय ? भालजींनी आपल्या चित्रपटातुन छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक अशी आदर्श व्यक्तिमत्त्व लोकांसमोर उभी केली. त्यामागचा विचार हा आता स्वराज्याचा तर होताच पण "सुराज्य" स्थापनेचा ही होता.
वर म्हंटल्याप्रमाणे बाबुराव ह्यांचा कल कालात्मकतेकडे जास्त होता हे जरी खरं असलं तरी बाबुरावांनी लोकांना क्रांती करण्यास, अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रोत्साहन देणारे चित्रपट बनवले. हे ही तितकंच खरं आहे.
"सैरंध्री" हा त्यातील एक. "किचकवध" ह्या नाटकवर त्याकाळी ब्रिटिश सरकारने बंदी आणली होती. बाबुरावांनी त्याच विषयावर "सैरंध्री" हा मुकपट काढला. त्यात त्यांनी अतिशय चपखल भाषेत मार्मिक, टायटल्स टाकले होते.
"शेळी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा वाघ होऊन एकच दिवस जगावं..."
"परसेवा आदमी को कितना लाचार बनाती है ।" ही दोन त्यातलीच टाईटल्स...
आशा रीतीने त्याकाळी ज्यानेत्याने आपापल्या परीने स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले. त्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहून आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
शेख फतेलाल
महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून किंबहुना त्यापूर्वीपासून आनंदराव आणि बाबुराव ह्यांच्या सोबत जी मंडळी होती त्यातलेच एक म्हणजे फतेलाल. फतेलाल ह्यांचे वडील पाथारी होते. पुढे फतेलाल बाबुरावांसोबत राहून नाटकाचे पडदे रंगावण्यापासून, चित्रपटांची पोस्टर्स तसेच चित्रपटांचे सेट उभारण्यापर्यंत सगळ्यात पारंगत झाले. फतेहलाल यांचं figure drawing ही उत्तम होतं. बाबुराव स्वतः जेव्हा figure drawing करत तेव्हा फातेहलाल त्यांचं निरीक्षण करीत व बाबुरावांच्या रेषांमधील गोडवा आपल्या चित्रात ही उतरावा ह्याचा ते प्रयत्न करीत.
पुढे फतेलाल, दामले, धायबर, शांताराम ह्यांनी प्राभात ची स्थापना केली. संत तुकाराम हा चित्रपट फतेलाल आणि दामले ह्यांनी एकत्रित दिग्दर्शित केला होता.
फातेहलाल ह्यांनी प्रभातच्या अनेक चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले. सेट उभारण्यामध्ये त्यांचा हात धरू शकणारा त्याकाळी तरी कोणीही नव्हता, हे चंद्रसेना ह्या चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. पाताळलोक कसा असेल हे कोणीही पाहिलेले नाही. पण "चंद्रसेना" ह्या चित्रपटामधला "पाताळलोक" फतेहलाल यांनी हुभेहुब पाताळलोकच वाटावा असा साकारला होता. शेवटी आनंदराव-बाबुराव ह्यांच्या खाणीत तयार झालेला हा हिरा होता.
तुम्हाला आठवत असेल, प्रभातच्या प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला तुतारी वाजवताना एक स्त्री आपल्याला दिसते, त्या गुलाब बाई. ह्या गुलाब बाईंशीच पुढे फतेलाल यांचे लग्न झाले.
फातेहलाल ह्यांनी "प्रभातसाठी" शेवटपर्यंत काम केलं.
Kalamaharshi Baburao Painter yanchyabaddal amhi tr mahiti detach ahot pn tumchyakade kahi mahiti asel tr tumhi share karu shakta...share karnyasathi tumhi comment box cha vapar karu shakta...🙏 tumchyakadchi mahiti comment kara athava amchya pge chya inbox madhe pathava... 😇
बाबूराव आणि लोकमान्य
आजपासून १०० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १ ऑगस्ट १९२० साली टिळकांनी आपला देह ठेवला. टिळकांच्या १००व्या स्मृतिदिनानिमित्त १९२० सालचीच एक आठवण.
"७ फेब्रुवारी १९२०" साली "सैरंध्री" हा अस्सल स्वदेशी चित्रपट प्रदर्शित झाला. टिळकांनी हा चित्रपट पहावा अशी बाबुरावांची इच्छा होती. दुसऱ्याच दिवशी ही इच्छा पूर्ण झाली. दुसऱ्याच दिवशी टिळकांनी "सैरंध्री" पहिला. टिळकांनी चित्रपट पाहिला त्याची दोन करणं होती. हा चित्रपट अस्सल स्वदेशी होता, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरलेला कॅमेरा आणि प्रिंट मशीन हे बाबुरावांनी स्वतः तयार केलेले होते. आणि दुसरं म्हणजे १९१८ साली बाबुरावांनी टिळकांचे एक भाषण चित्रित केले होते.
टिळकांना सैरंध्री तर आवडलाच पण चित्रपट हे माध्यम किती प्रभावी असू शकतं हे टिळकांच्या ह्या बोलण्यावरून लक्षात येईल. लोकमान्यांनी बाबुरावांना "जालियनवाला बागेतील घटनेवर चित्रपट बनविण्यास सांगितले. म्हणाले, आमच्या शंभर लेखांनी जे साध्य होईल ते तुमचा एक चित्रपट करून दाखवील."
११ फेब्रुवारी १९२० रोजी टिळकांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन बाबुरावांचा सत्कार केला गेला. पण ह्या सुवर्णपदकापेक्षाही मोलाचा सन्मान बाबुरावांसाठी होता तो म्हणजे, टिळकांनी त्या सत्कार समारंभात बाबुरावांना "सिनेमा केसरी" म्हणून संबोधले . ही एकप्रकारे पदवी होती.
"सिनेमा केसरी" ही पदवी मिळणं, ती ही प्रत्यक्ष कर्मयोगी लोकमान्य टिळकांकडून. ह्या अमूल्य व अतुल्य पदवीपुढे आज दिले जाणारे फिल्मफेअर आणि राष्ट्रपती पुरस्कार ते काय !
आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Address
Pune
Pune, 411030
**We give to information our viewers short films , temples ,Caves, fort & historical place**
Harsh Cine Equipment, Chaitanya Nagar, Bharati Vidyapeeth, Dhankwadi
Pune, 411043
professional Acting institute
Wagholi
Pune, 221307
Film/Music Producer And Director Indian Film Industry
Pune
Akshay Indikar is a 'Young Cinema Award' winning Filmmaker. Trijya and Sthalapuran. Cinema lab
Pune, 411001
subscribe my you tube channel https://www.youtube.com/channel/UCcJtAAdX-vWKf54EPPLSzXw
Pune
I am a independent filmmaker from Pune. Have made 50+ short films, 3 feature films & 1 webseries..